जात, अट्रॉसिटी आणि
महिला अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र मागील काही महिन्यांपासून ढवळून निघाला आहे. या
संदर्भात मिनाज लाटकर यांनी 'माध्यम'साठी किरण मोघे
यांच्याशी साधलेल्या संवादाचे हे शब्दांकन...
फोटो - IBTtimes.Uk
आजपर्यंत स्त्री ही तिच्या समाजातील हक्काच्या आणि स्थानाच्या दृष्टीकोनातून दुर्लक्षितच राहिलेला समाज विषय आहे. स्त्रियांच्या समस्यांकडं गांभीर्यानं पाहण्याची मानसिकता अजूनही आपल्या समाजात रुजलेली दिसत नाही. प्रत्येक वेळी प्रशासनाला जाग येण्यासाठी एखादी घटना घडावीच लागते. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराची चर्चा ही 1982 - 83 सालापासून सुरु झाली. 1982 मध्ये आदिवासी महिलेवर पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार करण्यात आला होता. त्यावेळी जेव्हा ही केस कोर्टात दाखल झाली तेव्हा महिलेच्या शरीरावर खाणाखुणा नसल्यामुळे बलात्कार झाला असं म्हणता येणार नाही. असं निरिक्षण न्यायालयानं नोंदविलं होतं. हा एक पहिला टप्पा होता. त्यानंतर भंवरीदेवी खटल्यामध्ये खालच्या म्हणजेच दलित जातींच्या स्त्रियांवर वरच्या जातीचे पुरुष बलात्कार करूच शकत नाहीत असं न्यायालयाचं विधान होतं. त्यावेळी महिला संघटनांनी हा विषय लावून धरला.
भंवरीदेवी ही महिला नोकरी करत होती. काम
करत असताना तिनं गावात होणारा बालविवाह रोखला. त्या रागातून तिच्यावर बलात्कार
करण्यात आला. तेव्हा सामाजिक काम करत असताना सुद्धा महिलांना अशा अनेक अडचणींना
सामोरं जावं लागतं. हा प्रश्न 1992 मध्येच उपस्थित झाला पण कामाच्या ठिकाणी लैगिक
अत्याचार प्रतिबंध कायदा संमत व्हायला 2013 उजाडले.
महिला अत्याचार आणि दलित अत्याचाराच्या
प्रकरणांवर भाष्य करताना खैरलांजी घटना महत्त्वाची आहे. एका दलित कुटुंबावर
सूडबुद्धीतून हल्ला करण्यात आला तसेच त्या कुटूंबातील महिलांवर सामूहिक बलात्कारही
करण्यात आला. पण बलात्कार आणि अट्रॉसिटी दोन्ही गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील
अपयशी ठरले. सध्या ही केस सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महिला अत्याचाराच्या
बाबतीत जे काही कायदे आजपर्यंत झालेत ते राज्यसंस्थांनी स्वतःहून किंवा स्व:इच्छेने कधीच केले नाहीत. प्रत्येकवेळी अत्यंत भयानक घटना घडल्या आहेत, आंदोलनं झाली, मगच कायदे करण्यात आले. निर्भयाकांड घडावं लागलं मगच कायदा
झाला. यावरूनच सरकार महिला प्रश्नांवर किती गंभीर आहे हे कळतं.
कायदे
तयार करत असताना देखील राजकीयदृष्ट्या सोयीचे केले जातात. फक्त कायदे करून उपयोग
नसतो. तर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी देखील राज्यसंस्थेनं झटावं लागतं. अट्रॉसिटी
बाबतीतही तसंच आहे. अट्रॉसिटी कायद्याच्या अंलबजावणीसाठी योग्य तरतूद असणं गरजेचं
आहे. अट्रॉसिटीसाठी विशेष न्यायालयाची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात खैरलांजी, सोनाई, खर्डा अशा घटना घडल्या. तसेच महिला, त्यातही
विशेषता दलित महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. दहा
वर्षानंतरही खैरलांजी प्रकरण न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. अशा हजारो केसेस अजूनही न्यायाच्या
प्रतीक्षेत आहेत. सातत्यानं अशा घटनांचे खटले जलदगती न्यायलयात चालविण्याचं
आश्वासन दिलं जातं. पण फक्त जलदगती न्यायालयांच्या स्थापनेमुळं पिडितांना न्याय
मिळेल ही अपेक्षा चुकीची आहे.
न्याय मिळण्यासाठी कायद्यात तरतूद
केल्याप्रमाणं विशेष न्यायालयाची गरज आहे. तसेच दलित, आदिवासी महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराचं प्रमाण बघता अशा केसेस
हताळण्यासाठी एका स्वतंत्र यंत्रणेची गरज प्रकर्षानं जाणवते.
केस न्यायालयात जाणं हा न्याय
प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असला तरी न्याय देण्यासाठी न्यायालयाला विविध
यंत्रणांवर अवलंबून राहावं लागतं. त्यात प्रामुख्यानं तपास यंत्रणा अर्थात पोलिस,
वैद्यकीय यंत्रणा यांचा समावेश होतो. तक्रार दाखल करण्यास गेल्यानंतर पोलिस तक्रार
नोंदवून घेण्यास वारंवार टाळाटाळ करतात असा अनुभव आहे. त्यामुळं न्यायाच्या
प्रत्येक प्रक्रियेत स्त्रियांची परिक्षाच असते. बऱ्याच केस ह्या दाखलच करून
घेतल्या जात नाहीत. त्यातूनच पोलीस प्रशासन महिला अत्याचाराबाबत किती संवेदनशील
आहे हे दिसून येतं.
सध्या गाजत असलेल्या पिंक सिनेमातील
महिला पोलीस तपास अधिकारी ही वास्तवामध्ये सर्व ठिकाणी दिसून येते. जरी ती पोलिस
कर्मचारी महिला असली तरी देखील ती इथल्या एका यंत्रणेचा भाग बनून जाते. एकूणच
संवेदनशीलता ही जन्मजात नसते पण आपण ज्या कुटुंबात समाजात वाढतो, त्याचा व आपल्या भोवती असणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक घटकांचा परिणाम आपल्यावर
होत असतो. आपल्याला जर त्या व्यवस्थेत काही वेगळं जाणवू लागलं, अन्यायाची जाणीव होऊ लागली तेव्हा आपण परिवर्तनाची आणि संघर्षाची वाट
स्विकारतो. त्यासाठी आपण वावरत असलेली व्यवस्था ही अन्यायकारक आहे याची जाणीव होणं
गरजेचं आहे. सर्व गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीचा
मुळापासून विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळं एखादा गुन्हा घडल्यावर त्यातील एकच
गोष्ट केंद्रस्थानी ठेवून निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. या एकतर्फी दृष्टीकोनाचं
ताजं उदाहरण म्हणजे कोपर्डी घटनेला देण्यात आलेला जातीय रंग.
आपण सगळेच असित्वात असलेल्या समाजाचे
घटक आहोत. समाजात महिला ही एका व्यवस्थेचा भाग बनून जाते. त्यामुळं सातत्यानं
स्त्रीच स्त्रीवर अन्याय करते ही जी चर्चा करण्यात येते ती चुकीची आहे. पुरुषप्रधान
संस्कृतीत आता महिलापण आपलं अस्तित्व सिद्ध करू पाहत आहेत. पण जरी त्या महिला पडत
असल्या तरी त्या एका विशिष्ट समूहाची ओळख असतात. त्यामुळं संघर्षाच्यावेळी, धार्मिक दंगलीत, युद्धाच्यावेळी महिलांना लक्ष्य
केलं जातं. गुजरात दंगलीचं उदाहरण यासाठी अभ्यासता येईल.
स्त्रियादेखील स्वतःकडं एक महिला म्हणून
न पाहता मी अमुक एका जातीची स्त्री म्हणूनच पहात असतात. सध्याच्या काळात जातीय
अस्मितेचं राजकारण करण्यावर जास्त भर दिला जातो. मराठा मोर्चाच्या माध्यमातून मराठा
समाजातील स्त्रिया रस्त्यावर उतरल्या. हा खूप स्वागतार्ह बाब आहे. पिडित मुलीला
न्याय मिळण्यासाठी गप्प राहणाऱ्या स्त्रिया रस्त्यावर उतरल्या. पण यावेळी एक
प्रश्न उपस्थित होतो, की फक्त मराठा मुलीलाच न्याय मिळण्यासाठी स्त्रिया बाहेर
पडणार का ? अन्याय हा अन्याय असतो. त्याला न्याय मिळाला
पाहिजे, पण बऱ्याच वेळा अशा घटनांना जातीय रंग दिला जातो.
कोपर्डीची घटना ही जातीय द्वेषातून झाली
नसून ती पुरूषी मानसिकतेतून घडलेली आहे. स्त्री ही भोग वस्तू आहे या मानसिकतेतून
घडलेली आहे. जेव्हा जातीय भावनेतून अत्याचार केला जातो. तेव्हा तो अट्रॉसिटीच्या
कक्षेत येतो.
जाती आणि वर्ग टिकवून ठेवण्यासाठी
महिलांच्या लैगिकतेचा वारंवार वापर केला जातो. जेव्हापासून पती - पत्नी ही व्यवस्था अस्तित्वात आली तेव्हापासून
महिलांना बंधिस्त करण्यात आलं, त्यांच्या अस्तित्वावर निर्बंध
घालण्यात आले. कोणत्याही समजावर्गात पुरुषांवर लैगिकतेविषयचे कोणतेच निर्बंध
नाहीत. उलट पुरुषांच्या बहुपत्नीत्वाला समाज मान्यता मिळते. पतीव्रतेच्या नावावर
योनीशुचिते सारख्या क्रुर परंपरा निर्माण करण्यात आल्या. जातीव्यवस्था टिकवायची
असल्यास संकर थांबवणं व यासाठी स्त्रियांच्या लैगिंगतेवर निर्बंध लावणं, दुसऱ्या जातीत लग्न होऊ न देणं असे प्रकार केले जातात. या मानसिकतेतूनच
प्रेम झाले तर नितीन आगेसारख्या ऑनर किलिंगच्या घटना घडतात. स्त्री ही त्या समूहाच्या
इज्जतीचा भाग बनविली जाते, तिला त्या समूहाचं प्रतीक मानलं जातं.
त्यामुळं जेव्हा एखाद्या समूहावर हल्ला
केला जातो, तेव्हा त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार
करण्यासारखे प्रकार केले जातात. या सर्वांमध्ये स्त्रिया भरडल्या जातात.
स्त्रियांचं शरीर रणांगण ठरतं. सर्वच ठिकाणी स्त्रियांनी एका मर्यादेत राहून काम
करावं अशी मानसिकता असते. 'बहू दुधी आखूड शिंगी' अशा महिला समाजाला अपेक्षित असतात.
सध्या दलित स्त्रीवादाबद्दल समाजात
मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहेत. दलित स्त्रीवादातील एक मुद्दा महत्वाचा आहे, एकूण स्त्री मुक्ती आंदोलनांनी दलित स्त्रियांचे प्रश्न दुर्लक्षित केले
आहेत, हे मी नाकारणार नाही. पण प्रश्न केवळ दलित स्त्रियांचेच नाहीत तर सर्वच
महिलांचे आहेत, हेही विसरून चालणार नाही. सध्या जागतिक विकास प्रक्रियेत
स्त्रियांचं स्थान खालावत चाललं आहे. अत्याचारांचं प्रमाण वाढलं आहे. सक्षमीकरण
म्हणजे काय ? हा प्रश्न व्यवस्थेला विचारणं गरजेजं आहे. तसेच
वर्गीय विषमता मोठ्या प्रमाणात दिसत आहे. एका विशिष्ट वर्गातील स्त्रियांचा विकास
झाला आहे, तर गरीब श्रमिक वर्गाचा विकास होत नाही. पण यासाठी
आरक्षण मिळून प्रश्न सुटणार नाहीत. प्रत्येक
समूहाला आरक्षण मिळावं असं वाटतं. भाकरीचे तुकडे करण्यापेक्षा प्रत्येकाला भाकरी
मिळावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासाठी आपल्या व्यवस्थेत बदल घडविणं गरजेचं
आहे.
अट्रॉसिटी रद्द करा किंवा त्यात बदल करा
अशी मागणी होत असताना हा कायदा का अस्तित्वात आला ? हे
लक्षात घेणं गरजेचं आहे. भारतात सामाजिक विषमता ही जात, धर्म, लिंग यावर आधारलेली आहे. त्यामुळं विशिष्ट एका जातीवर अन्याय होतात.
समाजात स्त्रीचं स्थान काय आहे याचा विचार करून स्त्रीनं मुक्त होण्यासाठी, धर्माची
संरचना मोडण्यासाठी उपाय करणं गरजेचं आहे. त्यासाठीच स्त्रियांच्या संघटना वाढल्या
पाहिजेत व त्यांचा योग्य तो एक कृती कार्यक्रम असणं गरजेचं आहे. त्यासाठी शिक्षणाच्या
मूल्यव्यवस्थेत बदल होण्याची गरज आहे. उदा. पाठ्यपुस्तकातून स्त्रियांच्या प्रतिमा
कशा दाखवल्या जातात. उदाहरणार्थ आई घरी, बाब ऑफिसला, मुलगी घरकाम करते मुलगा खेळतो. अशा अनेक अंगानं बदल केले पाहिजेत.
व्यवस्था महिलांना सुरक्षितता देऊ शकते, यावर महिलांचा विश्वास नाही. जर त्यांना सुरक्षित वाटत नसेल तर संपूर्ण
समाजाची उलथापालट होते. मानवी मूल्यांचं जतन करून महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी
आवाज उठवण्याची गरज आहे. परिस्थिती कधीच सारखी नसते, परिवर्तन हा निसर्गाचा नियम
आहे. समाजाचं एकत्रित, संघटित काम करणं आवश्यक असून
समूहात्मक बदल होणं गरजेचं आहे. यातूनच परिवर्तन होईल. सध्याची परिस्थिती
निराशाजनक आहे. हा चळवळीचा काळ नाही. हा काळ टिकून राहण्याचा आहे. महिला घराबाहेर
पडून त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत ही महत्त्वाची गोष्ट असून बदल हा लगेच होत
नसतो त्यासाठी वेळ जावा लागतो. समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या स्त्रिया किती
सक्षम आहेत यावरून ठरत असतं. पण या काळात स्त्रियांनी संघटित होणं खूप गरजेचं आहे.
